औरंगाबाद - कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी "यूपीआय गेटवे'च्या इंटरफेसला बॅंका जोडण्यात आल्या; मात्र या ऍपचा व सामान्यांच्या अज्ञानाचा कमकुवत दुवा हेरून भामट्यांनी परस्पर ट्रॅन्झेक्शन केले. यात औरंगाबादेत असंख्य युजर्संना नऊ कोटींची झळ बसली. या प्रकरणात आता परस्पर ट्रॅन्झेक्शन करणाऱ्या निम्म्या भामट्यांनी शरणागती घेत बॅंकेत पैसे भरणा केला; तर उर्वरितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे एक हजार दोनशे चौदा जणांना असा फटका बसला. यात एकूण नऊ कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. यानंतर शहरातील विविध पोलिस ठाणे व आयुक्तालयात तक्रारींचा ओघ सुरू झाला. रिझर्व्ह बॅंकेने यूपीआय गेटवे सादर केल्यानंतर गेटवेच्या इंटरफेसला 21 राष्ट्रीयीकृत बॅंका ऍपद्वारे जोडण्यात आल्या. या ऍपमध्ये "रिक्वेष्ट मनी' हा असा प्रोगाम आहे की, याद्वारे एक लाखांपर्यंतची रकमेचे परस्पर ट्रॅन्झेक्शन करता येते. हीच बाब हेरून काहींनी ऍप डाऊनलोड केले. त्यानंतर मित्र, परिचित, अनोळखी व्यक्तींच्या ऍपबाबत अज्ञानाचा गैरवापर केला. मित्रानेच मित्राला टक्केवारीचे आमिष दाखवून परस्पर रकमेचे ट्रॅन्झेक्शन केले; तर काहींनी मित्राचे
सीमकार्ड घेऊन त्याच्या नकळत रक्कम हडपली. रकमेचे ट्रॅन्झेक्शन झालेल्या अनेक बॅंक खातेधारकांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर अनेक खातेदार घाबरून गेले. खात्यात पैसे नसतानाही रकमेचे ट्रान्सफर कसे झाले, हेच सूचत नव्हते. त्यांनी बॅंक व सायबरसेलशी संपर्क साधल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी आर्थिक गुन्हेशाखा, सायबरसेल, तसेच विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करून घेतल्या. तसेच काही वेळासाठी मोबाईल वापरणाऱ्या परिचितांची माहिती तक्रारीतून देण्यात आली. त्यांनी केलेल्या कारनाम्यांची माहिती पोलिसांना दिली. अशा संशयितांची तक्रारदारांनी बोलणी केल्यानंतर पन्नास टक्के प्रकरणात ट्रॅन्झेक्शन करणाऱ्या मंडळींनी रक्कम पुन्हा जमा केली. ""बॅंकेकडून आम्ही अशा खातेधारकांचे रेकॉर्ड मागविले आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.'' अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
काहीजण शहरातून पसार..
या ऍप्सची माहिती असलेल्या सायबर भामट्यांनी आपल्या मित्रांना, तसेच परिचितांना लाखो रुपये एचडीएफसी बॅंकेच्या खात्यावर वळवून घेत गंडा घातल्याचे समोर आले. या प्रकरणी युजर्स तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर काही प्रकरणात गुन्हे नोंद झाले आहेत; मात्र या प्रकरणात अटक झाल्याचे समजताच काहींनी शहरातून काढता पाय घेतला.
|