लातूर : जिल्ह्यात मंगळवारी (ता. 12) दोन ठिकाणी घडलेल्या घटनांत पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. बेवनाळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे दोघेजण तर कव्हा (ता. लातूर) येथे दोघेजण पाण्यात बुडून मृत्यू पावले. बेवनाळ येथील घटना मंगळवारी सायंकाळी तर कव्हा येथील घटना बुधवारी (ता. 13) सकाळी उघडकीस आली. बेवनाळ येथील किरण जाधव (वय 11 वर्ष) आणि इस्माईल बक्षुदिन शेख (वय 15) हे दोघे मंगळवारी सकाळी गावाजवळच असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते.
मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे तलावात पाणी आले तरी तलावातील मोठ्या प्रमाणात असलेल्या गाळाचा दोघांनाही अंदाज आला नाही. पोहण्यासाठी दोघांनी पाण्यात उडी घेतली पण गाळामुळे दोघेही पाण्यात रूतून बसले. यातच दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.
दुसऱ्या घटनेत लातूर शहरातील खंडोबा गल्लीतील सोहेल जमील पठाण (वय 14) आणि बळीराम बाबू लोखंडे (वय 18) हे दोघे आणखी एका मित्रासह मंगळवारी सकाळी अकरा वाजता कव्हा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. सोबतच्या मित्राने दोघांना पाण्यात बुडताना पाहून तेथून पळ काढला. मंगळवारी गेलेले दोघेही परत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता दोघांचे मृतदेह साठवण तलावात आढळून आले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.