औरंगाबाद - चलनबदलीच्या निर्णयाला सहकाराचे सांघिक संघटन बळी पडले असून, सहकार आणि आर्थिक संस्थांचा दृष्टिकोन सरकारच्या दृष्टीने हवा तसा नसल्यामुळे सहकार चळवळ डबघाईला आल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केला.
राजकारण आड न आणता अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवून सहकार चळवळीला गती देण्याची गरज असल्याचे मत या वेळी शरद पवार यांनी व्यक्त केले. सहकारासमोरील आव्हाने आणि उपायांबद्दल विचारमंथन करण्यासाठी सोमवारी सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, आदर्श समूहाचे अध्यक्ष अंबादास मानकापे आदी उपस्थित होते.
नोटाबदलाच्या निर्णयानंतर देशातील 50 टक्के लघुउद्योगांवर परिणाम झाला असून, 35 टक्के रोजगार कमी झाल्याचा आरोप शरद पवार यांनी एका उद्योजक संघटनेच्या अहवालाचा हवाला देत केला. रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत गेल्या दोन महिन्यांत तब्बल 53 लाखांची वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले. नोटाबदलाच्या निर्णयापूर्वी 30 लाख लोक प्रतिदिनी कामाला येत होते. निर्णयानंतर अनेक उद्योग बंद झाल्याने मजुरांची संख्या वाढून 83 लाखांवर गेली. याचा गंभीर विचार सरकारला करावाच लागेल, असे वक्तव्यदेखील पवार यांनी केले.
काळा पैसा घालवणे योग्य आहे; मात्र निर्णय राबवताना योग्य प्रकारची काळजी घेतली गेली नसल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर याचा विपरीत परिणाम असून, यामुळे सामान्य माणूस दुबळा होईल, असेही ते म्हणाले.
|