औरंगाबाद - साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीचे कारनामे बाहेर आल्यानंतर आता असे गैरप्रकार करणारी महाविद्यालये, विद्यापीठ प्रशासन पोलिसांनी आपल्या रडारवर घेतले आहे. विशेषतः विद्यापीठातील प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परीक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरुवारी (ता. 18) दिली.
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवून गैरमार्ग अवलंबला. परीक्षा झाल्यानंतरही पुन्हा पेपर सोडविण्याचे कारस्थान करण्यात आले. यात प्राचार्य, प्राध्यापक व कस्टोडीयनचा सहभाग असल्याचे समोर आले. या बाबी संस्थाचालक गंगाधर मुंढे व मंगेश मुंढे यांना माहिती होत्या. त्यांचेही याला समर्थन होते, अशा बाबींची कबुली साई महाविद्यालयाचा प्राध्यापक विजय आंधळे याने पोलिसांना दिली. त्यामुळे संस्थाचालक, प्राचार्यासह प्राध्यापकांनी शिक्षणाचे "दिवे' लावल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा पेपर सोडवणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या अकलेचे दिवाळेही निघाले.
पोलिस आयुक्त यादव म्हणाले, 'ज्यावेळी परीक्षेची निर्धारित वेळ संपली, त्यावेळीच विद्यापीठाने पेपर स्वत:च्या ताब्यात का घेतले नाहीत, ते पेपर का घेऊन जात नव्हते, याची विचारणा केली जाईल. तसेच विद्यापीठातील जबाबदारांसह परीक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाईल. असे गैरप्रकार करणारी महाविद्यालये आमच्या रडारवर आहेत.'' गैरप्रकार करणाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळला जाईल, असाच इशारा आयुक्तांनी महाविद्यालयांना दिला आहे.
राजकीय दबाव होता..
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. यामुळे हितसंबंध असलेल्या काही राजकारण्यांनी पोलिस विभागातील वरिष्ठांना फोनही केले. तसेच बऱ्याच जणांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली होती. कारवाईनंतर पोलिसांवर राजकीय दबाव होता, परंतू याला न जुमानता पोलिसांनी कोणालाच सूट न देता सर्वांवर गुन्हे नोंदवून अटक केली.
|