अध्यक्षपद निवडीचा चेंडू तटकरे, ठाकरेंच्या कोर्टात 

अध्यक्षपद निवडीचा चेंडू तटकरे, ठाकरेंच्या कोर्टात 

जालना - जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे सदस्य सहलीवर गेले आहेत. मंगळवारी (ता.21) सकाळी 11 वाजता अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक होत आहे. दोन्ही पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी जिद्दीला पेटले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याबाबतचा चेंडू मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर याबाबतचा निर्णय अवलंबून असल्याचे मानले जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची सत्ता स्थापन होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत युद्ध छेडले गेले. त्यानंतर राज्यस्तरावरही शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. निवडणुका संपल्यानंतरही दोन्ही पक्षांच्या संबंधात फारसी सुधारणा झाली नाही. त्याचे परिणामही जिल्ह्याच्या राजकारणावर दिसून येत आहेत. शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा कामाला लावली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जालना पंचायत समितीमध्ये शिवसेनेने भाजपऐवजी कॉंग्रेससोबत एकत्र येऊन पंचायत समिती ताब्यात घेतली. हेच समीकरण जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कायम ठेवण्याचा निर्धार शिवसेनेने केल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे भाजपने याबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे धुरा दिली आहे. श्री. लोणीकर यांनी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, याचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे मांडली. भाजपला 22 जागा मिळाल्याने अडीच वर्षे भाजप व त्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेने अध्यक्षपद घ्यावे, अशी भूमिका मांडली. श्री. खोतकर याबाबत काय भूमिका घेतात, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर श्री. लोणीकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतही चर्चा केली असून याबाबतचा चेंडू आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कोर्टात गेला आहे. 

शिवसेना, "राष्ट्रवादी'ची भूमिका महत्त्वाची 
अध्यक्षपद निवडताना शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीत विजयी झालेले सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी सहलीवर आहेत. मंगळवारी सकाळी मतदानाच्या वेळेवर ते पोचतील. भाजप सर्वाधिक 22 जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर त्यानंतर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 13, तर कॉंग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. दोन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com