सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनात ठराव
लातूर - नवी मुंबई व पुणे येथे संतसाहित्याचे संशोधन केंद्र स्थापन करावे. संतसाहित्य एकत्रित करून जगात शांतीचा संदेश देण्यासाठी व मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्तीसाठी संतसाहित्याच्या अभ्यास केंद्रांना प्रत्येकी पाच कोटी रुपये शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठराव येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनात घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
या संमेलनाचा समारोप बुधवारी येथे झाला. संमेलनात नऊ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात वृक्षलागवड कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कीर्तन घेऊन वृक्षलागवीडबाबत प्रबोधन करणे, गावागावांतील शेतकऱ्यांना शपथ देण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. मराठवाड्यातील गावोगावी होणाऱ्या हरिनाम सप्ताहामधील खर्च कमी करून व जनतेकडून आर्थिक वाटा घेऊन पाणी नियोजनाचे काम करणे, संतसाहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वारकरी संप्रदायातील संतांचे साहित्य, संत वाङ्मयाचे ग्रंथ छपाईसाठी त्या त्या देवस्थानला छपाईच्या 50 टक्के रक्कम शासनाने अनुदान म्हणून द्यावी, वारकरी संप्रदायातील संतांच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अविरत स्वच्छता राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र स्वच्छता मोहिमेची व्यवस्था करावी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक भक्तांकडून वाहनतळ कर, प्रवेश कर अथवा कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये, असे ठरावही या वेळी घेण्यात आले.
|