गारपीट नुकसानभरपाईपोटी चार कोटींची मागणी

Agriculture-loss
Agriculture-loss

बीड - हवामान खात्याने गारपिटीचा व अवकाळी पावसाच्या वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात ११ फेब्रुवारीला सकाळी गेवराई, शिरूर, माजलगाव व केज या चार तालुक्‍यांतील काही भागांत गारपीट झाली होती. जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालात जिल्ह्यातील ४२ गावांतील साडेदहा हजार हेक्‍टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले होते; मात्र प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यात नुकसानग्रस्त पीक क्षेत्रातून तब्बल सहा हजार हेक्‍टर क्षेत्र वगळण्यात आले असून, प्रत्यक्षात ४ हजार ४०२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७ लाख रुपये इतक्‍या निधीची गरज असल्याचे प्रशासनाने शासनाला कळविले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्ह्यात ११ फेब्रुवारीला सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी काही भागांत गारपीटही झाली. गेवराई, शिरूर, माजलगाव व केज या चार तालुक्‍यांतील ४ हजार ४०२ हेक्‍टरवरील पिकांचे यामध्ये नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ७ हजार २३ शेतकऱ्यांना या गारपिटीचा फटका बसल्याची अंतिम नोंद प्रशासनाने प्रत्यक्ष पंचनाम्याद्वारे घेतली आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये सर्वाधिक गेवराई तालुक्‍यातील ३ हजार ८५४.२५ हेक्‍टर, शिरूर तालुक्‍यातील ३९९.६९ हेक्‍टर, माजलगाव तालुक्‍यातील ८८.९९ हेक्‍टर, तर केज तालुक्‍यातील ६० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. नुकसानग्रस्त एकूण क्षेत्रामध्ये २ हजार ९६८ इतके जिरायत क्षेत्र, १ हजार १७६.४ हेक्‍टर इतके बागायत क्षेत्र, तर २५८.५१ हेक्‍टर इतक्‍या फळपीक क्षेत्राचा समावेश आहे. 

जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचा अंतिम अहवाल शासनाला पाठविला असून, यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या नियमानुसार जिरायत क्षेत्रासाठी हेक्‍टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे एकूण २ कोटी १ लाख ८२ हजार २६४, बागायत क्षेत्रासाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे एकूण १ कोटी ५८ लाख ८१ हजार ९४० रुपये, तर फळपीक नुकसानीपोटी हेक्‍टरी १८ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४६ लाख ५३ हजार १८० अशा एकूण ४ कोटी ७ लाख १७ हजार ३८४ रुपये निधीची आवश्‍यकता असल्याचे कळविले आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच सदर आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सहा हजार हेक्‍टर क्षेत्र वगळले
गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने गारपीट नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविला होता. यामध्ये जिल्ह्यातील ४२ गावांतील १० हजार ६३२ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कळविण्यात आले होते; मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने तहसील यंत्रणेला प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्ष बांधावर जाऊन करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ४ हजार ४०२ हेक्‍टर क्षेत्राचेच नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.

त्यामुळे प्राथमिक अहवालातील ६ हजार हेक्‍टर क्षेत्र वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्राथमिक अहवालात बीड तालुक्‍यातही पिकांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले होते; मात्र बीड तालुक्‍यात नुकसानच झाले नसून केज तालुक्‍याचा नुकसानीमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com