औरंगाबादमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्घाटन

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्चर सुरू करण्यात येणार असून त्यासंदर्भात केंद्राची मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ९) सांगितले. कांचनवाडी परिसरातील वाल्मी येथे उभारण्यात येणाऱ्या विधी विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कायद्याचे सरंक्षण करणाऱ्या विधी तज्ज्ञांची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यातील मागासलेल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले. 

यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व्ही. के. ताहीलरामनी, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे,  न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विद्यापीठाचे कुलगुरू एस. सूर्यप्रकाश, कुलसचिव व्ही. आर. सी. कृष्णा यांची उपस्थिती होती.


ज्ञान निर्मितीत विद्यापीठे अपयशी - मुख्यमंत्री 

जागतिकीकरणाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या, सायबर गुन्ह्यांना तोंड देणारे शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याची गरज आहे. जिथे ज्ञानाची निर्मिती होते, ज्ञान एकसंध बांधले जाते, तसेच ज्ञानाची अविरत प्रक्रिया चालते ते ठिकाण म्हणजे विद्यापीठ होय. मात्र दुर्दैवाने आपली पारंपरिक विद्यापीठे ज्ञाननिर्मिती प्रक्रियेत अपयशी ठरली आहेत. राज्य सरकार शैक्षणिक संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

समाजाचे लढवय्ये व्हा - न्यायमूर्ती व्ही. के. ताहीलरामनी

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व्ही. के. ताहीलरामनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विधी विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक कौशल्य अवगत करावे, विद्यापीठातून जे वकील घडतील त्यांनी नागरी समाजाचे लढवय्ये व्हावे, माणुसकी समोर ठेऊन करिअर घडवावे, ऑनलाईनच्या माध्यमातून कायद्याचे शिक्षण दिले जाते परंतु प्रत्यक्ष शिक्षण घेताना जशी ज्ञानाची देवाण-घेवाण होते तशी ऑनलाईनमधून होत नाही.

सरकारी कर्मचाऱ्याला अटकेसाठी 2 वर्ष उशीर का ? - हरिभाऊ बागडे 

सामान्य माणसाला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लगेच पोलीस अटक करतात परंतु सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्यास त्याच्या अटकेसाठी दोन दोन वर्षे कारवाई का होत नाही असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. आपल्या मनात ही बाब खूप दिवसापासून होती पण आज हे बोलण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंडियाचे नव्हे तर भारताचे वकील व्हा असे आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com