शेत एकच; भाव पावणेतेरा व साठ लाख!

शेत एकच; भाव पावणेतेरा व साठ लाख!

दौलताबाद - ‘समृद्धी’बाधित शेतीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दोन तालुक्‍यांत एकच शेत असल्याने एकाच जमिनीला वेगवेगळा म्हणजे एकरी पावणेतेरा व साठ लाख रुपये भाव शासनाने दिला आहे. फतियाबाद येथील सुभद्राबाई गंगाधर गाणार या शेतकरी महिलेला प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका बसला असून, त्यांनी याबाबत प्रशासनाकडे दाद मागितली आहे. संबंधित अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

फतियाबाद (ता. गंगापूर) येथून जाणाऱ्या नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे जमीन अधिग्रहण थेट खरेदीच्या मार्गाने करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी सहमती देत खरेदीखत करून  दिले, त्यांना दहा ते बारा दिवस उलटूनही अद्याप त्यांच्या खात्यात प्रशासनाने रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ते रस्ते विकास महामंडळ व महसूल विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. खरेदीखत होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मागे-पुढे फिरणारे अधिकारी, कर्मचारी आता आमचा फोनसुद्धा घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया गंगापूर तालुक्‍यातील गिरणारे येथील शेतकरी कचरू जारवाल यांनी दिली.

प्रशासनाने जमिनीचे दर काढण्यातही मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्याने जमीन अधिग्रहणाला वेळ लागत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे फतियाबाद येथील सुभद्राबाई गंगाधर गाणार या महिला शेतकऱ्याला प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका बसला आहे. त्यांच्या वडिलोपार्जित शेतातून हा महामार्ग जात आहे. त्यात त्यांची तीन एकर सोळा गुंठे जमीन जात आहे; परंतु त्यांना ५६ गुंठ्याला साठ लाख एकरी, तर दोन एकर जमिनीला बारा लाख पंचाहत्तर हजार रुपये एकरी दर मिळत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या त्या बळी ठरत आहेत. 

या दराविषयी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ गाणार यांची जमीन अर्धी औरंगाबाद तालुक्‍यात, तर अर्धी गंगापूर तालुक्‍यात असल्याने ही तफावत आहे.

दरपत्रकात फरक  
दरपत्रकानुसार औरंगाबाद व गंगापूर तालुक्‍यातील सुमारे एकाच शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीच्या भावात मोठी तफावत दिसून येत आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील माळीवाडा येथील शेतकऱ्याला एकरी साठ लाखांपर्यंत मावेजा मिळणार, तर गटाच्या शेजारीच गंगापूर तालुक्‍यातील फतियाबाद येथील शेतकऱ्याला एकरी बारा लाख पंचाहत्तर हजार रुपये मावेजा मिळणार आहे. जो शेतकरी अगोदर संमती देईल त्याला पंचवीस टक्के जास्त मावेजा देऊ असे सांगितले जात आहे. एकाच मालकाच्या जमिनीला दोन वेगवेगळे भाव देणे हे अन्यायकरक आहे. आम्ही आमचा लढा आणखी तीव्र करणार असून, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून ही तफावत दूर करावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती शेतकरी बाळू हेकडे यांनी दिली.

फळझाडे, विहिरींसाठी अडीचपट दर 
बागायती असलेल्या सर्वच्या सर्व जमिनी जिरायती दाखवून प्रशासनाने जमिनींचे कमी दर जाहीर केले आहेत, तरी झाडे, फळझाडे, विहिरी, शेतांमधील गोठे, अन्य बांधकामे यांचे मूल्यांकन करून अडीचपट दर देण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com