औरंगाबाद - 'सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात कडधान्यांचे पीक चांगले आहे. यंदा पावसामुळे तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन वाढलेले आहे. मात्र, त्यासाठी स्पष्ट खरेदी धोरण उपलब्ध नाही. या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडाच्या धर्तीवर विशेष निर्यात क्षेत्र निर्माण झाले पाहिजे,'' अशी अपेक्षा निवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
कृषी विभागातर्फे अयोध्यानगरच्या मैदानावर राज्यस्तरीय महाऍग्रो-2016 कृषी प्रदर्शनाने उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. मंगळवारपर्यंत (ता.27) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पाटील म्हणाले, "" देशातील कृषी परिस्थिती सुधारावयाची असल्यास कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीचा दर वाढविणे, कोरडवाहू शेतीकडे अधिक लक्ष देणे आणि मार्केटिंग ऍक्ट अस्तित्वात आणणे, या त्रिसूत्रीवर मोठ्या प्रमाणात काम व्हायला हवे.125 कोटी देशातील 52 टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. मात्र, शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. सध्याचा विकास जॉबलेस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचे? हा प्रश्न टाळून जमणार नाही. त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायला हव्यात किंवा शेतीसाठी योग्य धोरण निर्माण करायला पाहिजे.''
|