उस्मानाबाद - "सरकार व्यापार करू शकत नाही,' असे मत व्यक्त करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतमाल खरेदीच्या मुद्द्यावर गुरुवारी (ता. 23) उद्विग्नता व्यक्त केली. या पुढील काळात खासगी उद्योजकांकडून धान्याची खरेदी करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, 'गेल्या वर्षी शासनाने 72 लाख क्विंटल तूर खरेदी केली. इतिहासात पहिल्यांदा प्रतिक्विंटल पाच हजार पाचशे रुपये दराने एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूर खरेदी झाली. खरेदी केलेल्या तुरीची विक्री अपेक्षित असताना ती झाली नाही. त्यामुळे शासनाला फटका बसला. या पुढील काळात टाटा, बिर्ला अशा मोठ्या उद्योजकांकडून शेतमालाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शासनाला फटका बसणार नाही. शेतकऱ्यांनाही अपेक्षित पैसे मिळतील.''
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पाटील यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. अगदी काही मिनिटांतच उरकलेल्या या बैठकीत त्यांनी आढावा घेण्याऐवजी चिंतन करण्याचाच सल्ला अधिकाऱ्यांना दिला. ते सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करीत आहेत. प्रत्येक जिल्ह्यांतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न आहे. वेळेत काम होऊन या जिल्ह्यातीलही सर्व रस्ते चकाचक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
|