नांदेड - खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्राऐवजी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापले आहे. असे राजकीय प्रयोग करणे दुर्दैवी असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली.
खादी ग्रामोद्योगची डायरी, कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटविल्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे. यावर चव्हाण म्हणाले, 'गांधींजी हे खादीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवरून त्यांचे छायाचित्र हटविणे ही शोभनीय बाब नाही. सरकारची ही कृती म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. लोकांच्या मनात महात्मा गांधी यांची प्रतिमा आहे. सरकार ती कशी हटविणार?''
आघाडीबाबत चर्चा सुरू
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिकांच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत चव्हाण म्हणाले, आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकारिणीने भूमिका घेतली तर त्या-त्या ठिकाणी नक्की आघाडी होईल. सध्या वरिष्ठ स्तरावर आघाडीबाबत चर्चा सुरू आहे.
|