मुंबई - सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करणारा भाजप सत्तेत येऊन चार वर्षे शांत बसला आहे. सरकारी तिजोरी लुबाडून सरकारने आता देवस्थानांवर डल्ला मारणे सुरू केले आहे. हे असेच सुरू राहिले तर भाजप सरकारवर शनीदेवाचा आणि कोट्यवधी हिंदूचा कोप होईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
या वेळी समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि कल्याण येथील भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके उपस्थित होते. सिद्धिविनायक न्यासाच्या माजी विश्वस्तांकडून देणग्यांचा अपहार झाल्याप्रकरणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने चौकशीसाठी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. सिद्धिविनायक देवस्थानमधील आणखी गैरव्यवहार या पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. सरकारने आखून दिलेल्या आकृतिबंधापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या वेतनावर सहस्रावधी रुपयांची लूट केली जात आहे. विश्वस्तांनीच कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याविरोधात गंभीर तक्रारी करूनही सरकारने कारवाई केलेली नाही. ताब्यातील मंदिरे सांभाळता न येणारे सरकार कोणत्या तोंडाने नवीन मंदिरे ताब्यात घेत आहे, असा प्रश्न इचलकरंजीकर यांनी या वेळी उपस्थित केला.
तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर आदी मंदिरांतील घोटाळ्यांनी कळस गाठला आहे. असे असताना शनिशिंगणापूर आणि मुंबादेवी मंदिर ताब्यात घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. केवळ सरकारची तिजोरी भरण्यासाठी, पक्ष कार्यकर्त्यांचे भले करण्यासाठी हे पाप केले जात आहे का?
- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती
|