मुंबई - पवई तलावात शुक्रवारी (ता.23) रात्री बोट उलटून दोन जण बुडाले; तर एक जण बेपत्ता आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
"एनडीआरएफ' आणि अग्निशामक दलाने आज सायंकाळी दोन मृतदेह बाहेर काढले. त्यांची नावे रसूल मोहमूद खान (43) आणि आतिफ लतिफ खान (22) अशी आहेत. बेपत्ता असलेल्या दिनेश भोईरचा शोध सुरू आहे. तलावात हाउस बोट नेण्यास बंदी असतानाही ही बोट कशी गेली, याचा तपास पोलिस करत आहेत.
पवई परिसरात राहणारे रसूल खान, आतिफ खान, अबू मंडल, दिनेश भोईर, दीपक पाटील, परेश पांचोली, कुणाल पाटील व नरेश पाटील शुक्रवारी रात्री पवई तलावाजवळ आले. त्यांनी गणेशघाटाजवळ काही वेळ गप्पा मारल्या आणि साडेदहाच्या सुमारास बोटीने तलावात उतरले. बोट काही अंतरावर उलटली आणि ते पाण्यात बुडू लागले. हे पाहताच गणेशघाटाजवळ बसलेल्या काही तरुणांनी तलावात उड्या घेतल्या आणि अबू, दीपक, परेश, कुणाल यांना वाचवले. नरेश पोहत काठावर आला; तर तिघे बेपत्ता झाले.
स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेची माहिती पवई पोलिस ठाण्याला आणि अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले; परंतु अंधारामुळे दीड तासाने ते थांबवले. "एनडीआरएफ'च्या पाच तुकड्या शनिवारी सकाळी दुर्घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी आणि अग्निशामकच्या जवानांनी बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू केला. आज सायंकाळी रसूल व आतिफचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बेपत्ता दिनेशचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. बोट उलटण्याची मुंबईतील ही पहिलीच दुर्घटना आहे.
|