वडिलांचे चारित्र्य चांगले नसल्याचा आरोप
मुंबई - जन्मदात्या वडिलांचे चारित्र्य चांगले नसल्याच्या आरोपामुळे मुंबई उच्च न्यायालयाने बालिकेचा ताबा तूर्तास सरोगेटेड आईकडे ठेवण्याचा निर्णय दिला आहे.
इराणी नागरिक असलेल्या वडिलांनी मुलीचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात "हेबिअस कॉर्प्स'ची याचिका केली होती. मुलीचा जन्म सरोगसी मातेमार्फत झाला आहे. याचिकादार वडिलांनी सरोगसी आईबरोबर विवाह केला; परंतु काही महिन्यांतच आईने घटस्फोट घेतला. कुटुंब न्यायालयाने मुलीचा ताबा वडिलांकडे सोपवला होता; मात्र पत्नीने मुलीला त्याच्यापासून दूर नेले, असा आरोप वडिलांनी याचिकेत केला आहे.
ठाणे पोलिसांनी मुलीचा तपास करून आई व मुलीला न्यायालयात हजर केले होते. ही बालिका तीन वर्षांची आहे. न्या. रणजित मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. खंडपीठाने आई, वडील आणि पोलिस अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे दालनात चर्चा केली. पती-पत्नीचे एकमेकांशी पटत नसून, ते आरोप-प्रत्यारोप करत आहेत, असे या चर्चेतून उघड झाले. पतीचे चारित्र्य चांगले नसल्यामुळे त्याच्याकडे मुलीचा ताबा देऊ नये, त्याऐवजी मला मुलीचा ताबा द्या, अशी मागणी आईने केली. न्यायालयाने ती मान्य केली. मात्र, तूर्तास न्यायालयाने दोघींनाही "शांतिसदन' संस्थेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुलीच्या भविष्यासाठी चांगली संस्था सुचवावी, असे निर्देशही न्यायालयाने आईला दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी जूनमध्ये आहे.
|