मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात मुंबई कॉंग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता.7) मोर्चा काढला. नोटाबंदीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
नोटाबंदीचा निर्णय घेऊन 60 दिवस झाले आहेत, पण अजूनही देशातील स्थिती पूर्वपदावर आली नाही. गरीब आणि सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडत आहेत. यातच सरकार आणि रिझर्व्ह बॅंक नवनवीन निर्णय नागरिकांवर लादत आहेत. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कॉंग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या वेळी झालेल्या सभेत निरुपम यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदीनंतर किती पैसा गोळा झाला, कोणाकडून हे पैसे जप्त केले, त्याची नावे जाहीर करावीत. नोटाबंदीमुळे किती नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. भ्रष्टाचार किती प्रमाणात संपला, याबाबत पंतप्रधानांनी देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
|