मुंबई - अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकाने सोमवारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत मानखुर्द परिसरातून 110 किलो गांजा जप्त केला. एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील दोघे जण आहेत. ही टोळी महाराष्ट्र, बिहारसह देशातील पाच राज्यांत गांजाची तस्करी करत होते. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून मुलीसह एका महिलेला ते वाहनातून सोबत आणत असत.
याबाबतची माहिती उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती.
एएनसीचे पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द परिसरात सापळा रचण्यात आला. या टोळीने सोमवारी मानखुर्दजवळील जकात नाक्याजवळ बिहारमधून आलेल्या एका गाडीत गांजा लपवून आणला होता. हा माल घेण्यासाठी मुंबईतून दोघे जण टॅक्सीतून आले. टॅक्सीत माल भरत असताना पोलिसांनी छापा टाकला व आरोपींना ताब्यात घेतले. या साठ्याची किंमत 22 लाख रुपये असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिस अधिकारी नितीन बोधे, प्रशांत मोरे, प्रमोद कुंभार, नितीन बनकर व अरुण केदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|