डहाणू - "आपल्या देशात हिंदू धर्म कोणालाही आठवू नये, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याने काही घटक भरकटत आहेत. त्यामुळेच हिंदूंनी सजग राहिले पाहिजे. काही जण देशाच्या नाशावर टपले आहेत.
त्यांच्यापासूनही सावध व्हा,' असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तलासरी वनवासी विद्यार्थी वसतिगृह प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी सांगता कार्यक्रमानिमित्त डहाणू तालुक्यातील आसवे येथे आज विराट हिंदू संमेलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
इतिहासात जे तुटले, फुटले ते दुरुस्त करणे आपले कर्तव्य आहे. परदेशात अक्रमणानंतर अशा प्रकारे दुरुस्ती होते. त्यानुसार राममंदिर बांधण्यात येणार आहे. हिंदूंना जगाशी संघर्ष करायची आवश्यकता नाही, असेही भागवत म्हणाले. व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले, तर समाजामध्ये परिवर्तन होईल. त्यानंतर देशात परिवर्तन होईल. समर्पित कार्यकर्ते तयार झाले, तर भारत विश्वगुरू होईल, असे विचार या वेळी उपस्थित असलेले कोकण प्रांत केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केले.
|