मुंबई - ऍडव्होकेट कायद्यामध्ये करण्यात येणाऱ्या प्रस्तावित दुरुस्तीविरोधात आज बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्यांनी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या विधी आयोगाने वकील कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे सूचित केले आहे. मात्र ही सुधारणा वकिली व्यवसायासाठी आणि वकिलांसाठी मारक आहे, असा आरोप बार कौन्सिल या वकिलांच्या संघटनेने केला आहे. यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने निषेध आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज बार कौन्सिलसह वेगवेगळ्या न्यायालयांच्या वकील संघटनांनी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
संबंधित प्रस्तावित सुधारणेमुळे वकिली व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ज्या व्यक्ती वकिलीच्या व्यवसायाशी निगडित नाहीत, त्यांच्याकडे अधिकार जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दुपारी आंदोलन करण्यात आल्यामुळे वकिलांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिक न्यायालयांमधील कामकाज थंडावले होते.
|