मुंबई - येत्या पाच वर्षांत मुंबई एमएमआर क्षेत्रात दोनशे किमीचे मेट्रोचे जाळे उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
शिवस्मारक भूमिपूजनानिमित्त वांद्रा-कुर्ला संकुलात जाहीर सभा आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की या प्रकल्पांमुळे भिवंडीपासून कल्याण- मुंबईच्या आसपास शहरातील नव्वद लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. शिवडी-न्हावा शेवा या सागरी महामार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर फक्त अर्ध्या तासाचे नमूद केले. यानंतर ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार आणि रयतेचे राज्य या परिपाठाच्या आधारावर शासनाचा कारभार चालवणार आहे.
राज्यात तीन लाख कोटींचे रस्ते - गडकरी
येत्या तीन वर्षांत राज्यात तब्बल तीन लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करून नव्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. यासाठी शिवशाही आणायची असून, पंतप्रधानांच्या माध्यमातून तसे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना छत्रपती शिवरायांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या स्वप्नातले स्मारक आम्ही उभारत आहोत, असेही गडकरी म्हणाले. या वेळी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात विविध रेल्वे प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केले. मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
|