मुंबई - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनकार्य आणि चरित्र खंड राज्यभरातील ग्रंथालयात पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला; मात्र हे ग्रंथ हिंदी भाषेत असल्याने त्यावर नवता प्रकाशन आणि मराठी भाषा केंद्राने आक्षेप घेतल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
2016-17 हे वर्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे जीवनकार्य आणि चरित्र ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रेरणादायी ग्रंथ म्हणून खंड एक ते 15 हा संच राज्यभरातील तब्बल 10 हजार शासनमान्य ग्रंथालयांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने चार कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे; मात्र सदरचे ग्रंथ हिंदी भाषेत असल्याने त्याला विरोध होऊ लागला आहे.
ग्रामीण भागात अद्यापपर्यंत हिंदी भाषेचा प्रसारच झाला नसल्याने ग्रंथांचा उपयोग काय? असा सवाल नवता प्रकाशन संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये मराठी पुस्तकांची असून, हिंदी भाषिक एकही ग्रंथालय नाही. असे असताना हिंदी भाषेचाच अट्टहास कशासाठी, असा सवाल नवता प्रकाशनचे कीर्तीकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
|