मुंबई - तानसा जलवाहिनीवरील 11 हजार झोपड्या चार दिवसांत हटविण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे. या झोपड्या हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सहा वर्षांत फक्त चार हजार झोपड्या हटविण्यात महापालिकेला यश आले आहे.
मुख्य जलवाहिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने 10 मीटर परिसरातील झोपड्या हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या झोपड्या हटवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे; मात्र अजून 11 हजारांहून अधिक झोपड्या हटविण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. जलवाहिनीच्या बाजूला सुमारे 16 हजार झोपड्या होत्या. त्यातील पाच हजार झोपड्या हटविण्यात पालिकेला 2011 पासून यश आले आहे.
जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र सर्व जलवाहिन्या अतिक्रमणमुक्त झाल्या नसल्याने हा सायकल ट्रॅक कधी बांधणार, असा प्रश्न आहे.
न्यायालयात दाद मागणार
न्यायालयाने 31 तारखेची मुदत दिली असली, तरी अनेक कारणांनी झोपड्या हटविण्यास उशीर होतोय. अनेक वेळा पोलिस संरक्षण मिळत नाही. रहिवासी घरे सोडण्यास तयार नसतात. त्यामुळे न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न करू, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
जलवाहिनीवरील झोपड्या
के (पूर्व) अंधेरी - 1408 (सर्वेक्षण पूर्ण)
एफ (उत्तर) वडाळा, सायन - 2401 (रहिवासी कोर्टात)
एच (पूर्व) वांद्रे - 1633 (सर्वेक्षण पूर्ण)
एल कुर्ला - 5507 (315 झोपड्या हटवल्या)
जी उत्तर - 509
|