मुंबई - विमान प्रवासामध्ये प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत तडजोड होऊ नये, असे स्पष्ट करून इंडिगो आणि गो एअर कंपन्यांच्या वादग्रस्त इंजिनची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) आज दिले.
इंडिगो आणि गो एअर कंपन्यांतील "प्रॅट' आणि "व्हिटनी' या इंजिनमुळे विमानाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करणारी जनहित याचिका प्रवासी हरीश अगरवाल यांनी न्यायालयात केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. याबाबत आवश्यक ती उपाययोजना आणि तपासणी कंपनीने सुरू केली आहे, असे दोन्ही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.
संचालनालयाने याबाबत तपासणी केली आहे. आवश्यक त्या सूचना कंपनीला केल्या आहेत, असे केंद्र सरकारतर्फे अद्वैत सेठना यांनी सांगितले.
|