मुंबई - देशभरासह मुंबईतील प्राण्यांची लवकरच गणना सुरू होणार आहे. दुभत्या जनावरांसह घोडे, गाढव, खेचर, पक्षी यांचीही गणना होईल. यामुळे मुंबईच्या तबेल्यांमधील गाई आणि म्हशींची अधिकृत आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या पाळण्यात येणारी ठिकाणेही समजणार आहेत. या माहितीच्या आधारे वैद्यकीय मदत पुरविणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारने देशभरातील पाळीव प्राण्यांची गणना सुरू केली आहे. मुंबईतील पशुगणनेचे कामही सुरू होणार आहे. केंद्र सरकारकडून परिपत्रक आल्यानंतर ही गणना सुरू करण्यात येईल, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या गणनेत पाळीव श्वानांचीही गणना होण्याची शक्यता आहे.
पालिकेमार्फत पूर्वी तबेल्यांना परवाना दिला जात होता. त्या वेळी प्राण्यांच्या संख्येनुसार शुल्क वसूल केले जात होते. त्यामुळे प्राण्यांची निश्चित आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध होती; मात्र 2005 च्या पावसात शेकडो म्हशी बुडून मेल्यामुळे मुंबईतील तबेले शहराबाहेर हलविण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे पालिकेने परवानेही देणे बंद केले. यामुळे प्राण्यांची अधिकृत आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही.
लेप्टो हा आजार प्राण्यांच्या मलमूत्रातून पसरतो. गाई, म्हशी, घोडे यांच्या तबेल्यांची माहिती पालिकेकडे उपलब्ध आहे. तसेच हे प्राणी सहजपणे आढळून येतात; मात्र अनेक झोपडपट्ट्यांमध्ये शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. त्यांची माहिती उपलब्ध झाल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येतील.
|