मुंबई - तंबाखूसेवनाप्रमाणे दारूही आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांनी दारूबंदीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.
भारतीय आयुर्विमा महामंडळासह काही विमा कंपन्यांकडून तंबाखू कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. समाजात तंबाखूविरोधी मोहीम राबवणे गरजेचे आहे. विमा कंपन्या नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असतात. त्यांनी अशाप्रकारे गुंतवणूक केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जगभरात जातो, अशी तक्रार करणारी जनहित याचिका टाटा ट्रस्टच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी ज्याप्रमाणे तंबाखूविरोधात जनजागृती सुरू केली आहे, त्याप्रमाणे दारूबंदीबाबतही पुढाकार घ्यायला हवा. दारूमुळेही समाजावर घातक परिणाम होत असतात. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी त्याबाबत जागरूकता निर्माण करायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
|