मुंबई - "अग्निसुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन, तसेच मुंबई महापालिका आणि हॉटेलचालकांच्या बेजबाबदारपणामुळे कमला मिल कंपाउंडमध्ये अग्निकांड घडले. या घटनेत 14 निष्पापांना जीव गमवावा लागला. आता तरी महापालिकेने नियमानुसार कामकाज करावे,' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले.
आगीची ही घटना दुर्दैवी असून चिंताजनक आहे. त्यातून धडा घेऊन पालिकेने योग्य आणि नियमांनुसार कारभार करावा, असे न्यायालयाने सुनावले. या अग्निकांडाविरोधात निवृत्त पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हॉटेल-पब-रेस्टॉरंट आदी आस्थापनांना पालिकेकडून परवाने देताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे, हेच या दुर्घटनेतून उघड झाले आहे. आता तरी पालिका प्रशासनाने नियमांचे पालन केले जाईल हे पाहावे, असेही खंडपीठ म्हणाले. सरकारने महापालिका आयुक्तांना आगीसंबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चार दिवसांत अहवाल तयार होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. संबंधित अहवाल न्यायालयातही सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले.
|