मुंबई - मराठीत शिक्षण घेतल्यानंतर कारकीर्द (करिअर) घडविता येत नाही... मराठीची व्यावसायिक उपयुक्तता किती...असे अनेक समज आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा समज खोडून टाकण्यासाठी मराठीतही चांगली कारकीर्द घडविता येते, याबाबत तरुणाईला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बडोदा येथे 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यावरचा ऊहापोह, त्याच्या विविध पैलूंवर चर्चा, ग्रंथप्रदर्शन, काव्यकट्टा, ग्रंथ प्रकाशने, साहित्यिकांशी चर्चा असे साधारण स्वरूप असते. तसेच दरवर्षीच्या संमेलनात "मराठी भाषा टिकेल का?' असा परिसंवादही होतो.
आयोजकांनी या वर्षीपासून त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत तरुणाईला संमेलनामध्ये सहभागी करून घेत मराठी हा कारकिर्दीसाठी चांगला पर्याय कसा ठरू शकतो, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सहा विषयांची निवड करण्यात आली आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांशी संपर्क करण्यात आला आहे. तसेच गुजरातमधील मराठी तरुणाईशीसुद्धा संपर्क साधण्यात आला आहे.
...अशा आहेत कार्यशाळा
सूत्रसंचालन - निवेदन - प्रकाश पायगुडे (प्रशिक्षक)
कथालेखक- कवितालेखन - नीरजा (प्रशिक्षक)
डिजिटल मीडिया - ई-साहित्य - सुनील सामंत, साहिल चौधरी (प्रशिक्षक)
कवितेचे गाणे होताना - रवींद्र साठे (प्रशिक्षक)
ब्लॉग लेखन - क्षितिज पाटुकले (प्रशिक्षक)
साहित्य संमेलनामध्ये तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, त्याचबरोबर साहित्याच्या उत्सवाबरोबरच मराठीची कास धरून तरुणांचे भविष्य उज्ज्वल आहे हे प्रात्यक्षिकासह पटवून देण्यासाठी यंदा सहा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र व इतर प्रांतातील सुमारे 600 तरुण यामध्ये सहभागी होतील.
- दिलीप खोपकर, आयोजक, अखिल भारतीय साहित्य संमेलन
|