मुंबई - मुंबई महापालिकेने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये चांगले काम केले, म्हणूनच कालच्या अतिवृष्टीनंतरही आज मुंबई पूर्वपदावर आली आहे'' असा दावा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला.
मुंबई आणि उपनगरे मंगळवारी (ता.29) झालेल्या पावसामुळे अक्षरश: तुंबली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे आणि मुंबईचे आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेने आतापर्यंत केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. ""मुसळधार पावसाचा अंदाज असला, तरीही अतिवृष्टी होईल, असे वाटले नव्हते; पण काल मुंबईत भरपूर पाऊस झाला आहे, हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही,'' असे विधान ठाकरे यांनी केले. ""काल मुंबईवर नऊ किलोमीटर उंचीचा ढग होता. आपल्या सुदैवाने ढगफुटी झाली नाही,'' असेही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले..
-26 जुलैच्या अनुभवानंतर महापालिकेने जे काम केले, त्यामुळे कालच्या पावसानंतरही आज मुंबई तुंबलेली नाही.
- आपत्कालीन परिस्थिती मुंबई महापालिकेच्या कक्षाने चांगल्या पद्धतीने हाताळली.
- निसर्गाशी लढून यशस्वी झालेला एकतरी माणूस दाखवा.
- अतिवृष्टीच्या बातम्यांमुळे गोरखपूरमध्ये पुन्हा बालकांचे मृत्युकांड झाले, याकडे दुर्लक्ष झाले.
- आम्ही नालेसफाईच्या कामांची पाहणी करतो, ती नाटके नसतात. नाल्यातील काही ठिकाणची अतिक्रमणे काढलेली आहेत.
- आपण एका मर्यादेपर्यंतच निसर्गाचा सामना करू शकतो. हा निसर्ग आहे; त्याचा अंदाज आपण करू शकत नाही.
- मुंबईची भौगोलिक मांडणी समजून घ्या. अतिवृष्टी आणि भरती एकाच वेळी आली, तर पाणी शहरात शिरते. त्याला आपण काहीही करू शकत नाही.
- नालेसफाई झाली नाही, हा आरोप खोटा.
- रोगराई निर्माण होऊ नये, म्हणून आवश्यक ते निर्णय घेण्यात आले.
- महापालिका, बीईएसटीचे कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यांवर उतरून जनतेची मदत करत होते.
- मी खऱ्या मुंबईकरांना बांधील आहे; विरोधकांना नाही.
- आरोप करणाऱ्यांनी काल मुंबईत काय केले, याची माहिती घ्या.
- जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशीर्वाद दिला आहे.
|