मुंबई - रात्रशाळेतील शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उद्या (ता. 24) भेट घेणार आहोत, अशी माहिती रात्रशाळा संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख दर्शना पांडव यांनी दिली.
राज्यात 176 रात्रशाळा आहेत. यातील शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद दिले जावे, दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांना रात्रशाळेतून कमी केल्यानंतर रिक्त झालेली पदे भरली जावीत, पेन्शन योजना लागू करावी, रात्रशाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि माध्यान्ह भोजन द्यावे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. बहुतांश रात्रशाळेतील शिक्षकांचे अद्यापही समायोजन झालेले नाही. या समस्यांच्या निराकरणासाठी उद्या राज्यभरातून रात्रशाळेतील शिक्षक शिक्षणमंत्र्यांना भेटायला जाणार, असे पांडव यांनी सांगितले.
रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अद्याप वेतनभत्ता मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रशाळेतील दुबार शिक्षकांनी केवळ सकाळच्या सत्रात नोकरी करावी, असे आदेश जारी झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता.
शिक्षणविभाग रात्रशाळा बंद करण्याचा घाट घालत आहे, असा आरोप काही शिक्षक संघटनांनी केला होता. या निर्णयाने केवळ रात्रशाळेच्या नोकरीवर उपजीविका करणाऱ्या शिक्षकांचा पगार वेळेवर सुरू होईल, अशी भूमिका शिक्षण विभागाच्या वतीने मांडण्यात आली. मात्र अद्याप केवळ रात्रशाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
|