मुंबई - बंद पडलेल्या अनुदानित शाळेसाठी शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. संस्थाचालकांनी आपापसात वाद करून संस्था बंद पाडल्याने मागील पंधरा महिन्यांपासून पगार मिळाला नाही. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांनाही अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे.
शिरोळ, वांजरवाडा (जि. लातूर) येथे संत कबीर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ही पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा चालवली जाते.
मात्र काही महिन्यांपूर्वी या शाळेची मान्यता सरकारने काढली. त्यामुळे शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी अन्यत्र वर्ग करण्यात आले आहेत. या शाळेला मान्यता आणि अनुदान होते. मात्र, संस्थाचालकांच्या मनामानी कारभाराने ही शाळा बंद पडली आहे. या शाळेत 11 शिक्षक आणि कर्मचारी कायमस्वरूपी नोकरीला होते. त्यांचे वेतन मागील पंधरा महिन्यांपासून थकले आहे. याबाबत शिक्षकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते, शिक्षणमंत्री व लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
|