मुंबई - मुंबई ते गोवा अशी सुपरफास्ट "तेजस एक्स्प्रेस' कोकण रेल्वेने सुरू केली; मात्र 22 मे रोजी मुंबईकडे येत असताना गैरसोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी सोशल मीडियावरूनही व्यक्त होत आहे.
या आरामदायी गाडीतील प्रवाशांचा प्रवास सुखद होईल, असा दावा रेल्वेने केला आहे. मुंबईहून निघाल्यानंतर प्रवाशांनी खाल्लेल्या खाद्यपदार्थांची वेष्टने व कागदाचे ग्लास परतीच्या प्रवासात तसेच पडलेले होते. काही आसनांवर तोंड पुसण्यासाठी वापरलेले टिश्यू पेपर तसेच होते. परतीच्या प्रवासात गाडीची सफाई करण्यात आली नव्हती. डब्यांबरोबरच प्रसाधनगृहांतही सफाई केलेली नव्हती. त्यामुळे डबे वातानुकूलित असले, आसने व अन्य सोयी असल्या, तरी अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या कपाळाला आठ्या पडल्या. याकडे लक्ष वेधल्यानंतरही "तेजस'मधील कर्मचाऱ्यांनी सफाई केली नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. प्रवाशांनी मागविलेले खाद्यपदार्थही वेळेवर मिळाले नाहीत. रत्नागिरी स्थानकात बहिणीला भेटण्यासाठी उतरलेल्या एका प्रवाशाला स्वयंचलित दारे बंद झाल्यामुळे गाडीत चढता आले नाही, असेही समजते.
|