मुंबई - मॉन्सूनपूर्व पावसाने महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवले. गुरुवारी मध्यरात्री मालाड सबवे आणि शुक्रवारी सकाळी जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता; तसेच अंधेरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात काही काळ पाणी साचले होते. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबईतील नालेसफाई चोख झाली असल्याचा दावा शिवसेना आणि महापालिका प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, विरोधकांनी या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित केले होते; तसेच "सकाळ'ने सुरू केलेल्या नालेसफाईच्या ऑडिटमध्येही अनेक नाले अद्याप गाळात अडकले असल्याचे दिसून आले. मॉन्सूनपूर्व पावसाने पालिकेचे हे दावे फोल ठरवले आहेत.
मुंबईत आज दिवसभरात 44 मि.मी. पाऊस झाला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी जोगेश्वरी हा महत्त्वाचा रस्ता आहे. येथे सकाळीच पाणी साचल्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती; तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.
|