राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; 55 रुपये प्रतिकिलो दर राहणार
मुंबई - नाफेडच्या सहकार्याने राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.
राज्यात 2016-17 च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली होती. यामध्ये राज्य शासनाने स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 25 लाख 25 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीच्या भरडाईस राज्य सरकारने परवानगी दिली होती. ही भरडाई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रास्त भावात विक्रीसाठी काढण्यास आज राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली.
त्यानुसार ही तूरडाळ आता प्रतिकिलो 55 रुपये दराने शिधापत्रिकाधारकास मिळणार आहे. या बरोबरच राज्य सरकारच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये 1 किलोच्या पॅकिंगसाठी 80 रुपये तर 50 किलोच्या पॅकिंगसाठी 3750 रुपये याप्रमाणे तूरडाळीचा पुरवठा करण्यासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
यात शालेय शिक्षण विभागाला तीन लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2160 क्विंटल आणि महिला व बालविकास विभागाला तीन लाख 60 हजार 600 क्विंटल तूरडाळ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागालाही याच दरानुसार तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ई-निविदेद्वारे डाळीची खुल्या बाजारात विक्री ऑफसेट किंमत 55 रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
|