मुंबई - अपेक्षित वसुली न झाल्याने महावितरणने थकबाकीदार आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकरता नवप्रकाश योजनेला पुन्हा मुदतवाढ जाहीर केली आहे. सार्वजनिक नळयोजनेच्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर सर्व ग्राहकांना 31 जुलैपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात महावितरणला फारसे यश मिळाले नाही. याबाबत कंपनीने थकबाकीदारांसाठी सेलही स्थापन केले आहे. नोव्हेंबर 2016 अखेर 29 हजार कोटींवर थकबाकी पोहचली. त्यात सर्वाधिक कृषी ग्राहकांची 17 हजार कोटींची थकबाकी आहे. कायमस्वरूपी थकबाकीदार ग्राहक सहा हजार कोटी आहेत.
नवप्रकाश योजनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मूळ थकबाकी भरल्यास 100 टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केले जाणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीपर्यंत योजनेची मुदत होती. ग्राहकांनी 1 मे ते 31 जुलैपर्यंत मूळ थकबाकीसह व्याजाची 25 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 75 टक्के व्याज आणि 100 टक्के विलंब आकार माफ केले जाणार आहे.
|