नेरळ : येथील भूखंडावर बिल्डरने खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात शनिवारी बुडून मृत्यू पावलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या पार्थिवावर 24 तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणत्याही परवानगीविना हा खड्डा खोदल्याप्रकरणी बिल्डरला अटक करावी, असा आग्रह मुलींच्या नातेवाइकांनी धरला होता; मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत साईमंदिर परिसरात गृहसंकुलासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात या मुली बुडाल्या. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील काही कुटुंबे येथील भागीत चाळीत राहतात. त्यापैकी संजीव सुरे यांच्या संगीता आणि पूजा या मुलींचा बुडून अंत झाला. नेरळ पोलिसांनी बिल्डर राजेश ठाकूर (उल्हासनगर) आणि सुपरवायझर शेखर घाडगे (नेरळ) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, घाडगेला अटक केली आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह पोलिसांनी सुरे कुटुंबाच्या ताब्यात दिले.
त्या वेळी बिल्डर ठाकूरला अटक होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलींचे वडील संजीव शेषराव सुरे, आजी कमल सुरे आणि आई मीराबाई संजीव सुरे यांनी घेतली. सुरे यांच्या नातेवाइकांनी ज्या ठिकाणी मुली बुडाल्या, त्याच ठिकाणी दफनविधी करण्याचा हट्ट धरला. शेवटी जिल्हा पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांनी आरोपी बिल्डरला अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
|