मुंबई - शहरातील प्रमुख नाक्यांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग येत्या महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केला जाणार आहे. पोलिस या कॅमेऱ्यांतून परिस्थितीवर लक्ष ठेवतील व त्यानुसार योग्य ती कृती करतील.
आगामी पालिका निवडणुकांसाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी 25 सूत्री कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार पोलिस काम करतील. मुंबई महापालिका निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. यंदाची निवडणूक सर्व पक्षांकरता प्रतिष्ठेची ठरणार आहे. यंदा या निवडणुकांमध्ये मुंबईत काही प्रभागांची रचना बदलली आहे. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
निवडणुकांच्या वेळी पोलिसांनी कशा पद्धतीने काम करावे, याबाबत कृती आराखडा तयार केला आहे. 25 सूत्री कार्यक्रम तयार करून निवडणुकांच्या वेळी राबविला जाईल. प्रचाराच्या वेळी अनुचित घटना रोखण्यावर अधिक भर दिला जाईल. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या समोरासमोर येऊ नयेत, याची काळजी घेतली जाईल.
प्रचाराबाबतचे सर्व परवाने पोलिस ठाण्यामार्फत दिले जातील. समाजकंटकांवरही पोलिस लक्ष ठेवतील. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
महापालिका निवडणुकांसाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. शहरात अनुचित घटना घडू नये, यासाठी एक एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टिम) तयार केली आहे. तिचा वापर करून निवडणूक काळात बंदोबस्त ठेवला जाईल.
- दत्ता पडसलगीकर, आयुक्त, मुंबई पोलिस
|