मुंबई - शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या (मंगळवारी) मुंबईत होत असून, शिवसेना आणि भाजप युतीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुल येथे शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिवसेनेचा समावेश असला तरी भाजपकडून नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. मात्र, शिवसेनेने अद्याप राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. काल ईशान्य भाररतातील काही राज्याच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी देशातील प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करण्याची विनंती करण्यात आली.
त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला समर्थन देत भाजपच्या कारभाराला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|