मुंबई - मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त केले असून या कामात भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. भाजपने याबाबत शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
नालेसफाईबाबत आम्ही 100 टक्के असमाधानी असून मंगळवारची (ता. 10) शिवसेनेची पाहणी कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यासाठी होती, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नालेसफाईवरून कलगीतुरा सुरू झाला आहे.
नालेसफाईची उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पाहणी केली. नालेसफाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारापुरता होता. भ्रष्टाचार अजूनही सिद्ध झालेला नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. नालेसफाईच्या टक्केवारीपेक्षा मुंबईत पाणी तुंबणार नाही याकडे पालिकेचे लक्ष राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपतर्फे शेलार यांनी "पारदर्शकतेचे पहारेकरी' बनून उद्धव यांना लक्ष्य केले आहे. भ्रष्टाचारी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना "क्लीन चिट' देण्यासाठीच हा दौरा होता, असे शेलार यांनी म्हटले आहे.
नालेसफाईबाबत आपण जराही समाधानी नाही, असे त्यांनी सांगितले.
पालिकेने जून 2015 मध्ये नालेसफाईच्या कामांबाबत चौकशी केली. त्या वेळी 24 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले. कंत्राटदार आणि अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.
भाजपने दाखवल्या बनावट पावत्या
पालिका प्रशासनाने नाल्यांतील नेमका किती गाळ काढला जातो आणि तो कुठे टाकला जातो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी नालेसफाईबाबतच्या काही बनावट पावत्या दाखवल्या. त्यामुळे नालेसफाईतील भ्रष्टाचार थांबला नसल्याचे दिसत आहे.
|