उल्हासनगर : प्लॅस्टिक बंदीची मोहीम घरापासूनच व्हावी किंबहूना करावी या सकारात्मक उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिकेत प्लॅस्टिकच्या वस्तूंना मज्जाव करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने बिसलेरी बाटल्यांचा समावेश असल्याने पाणी पिण्याचे वांदे अशी परिस्थिती कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या नळावर ओंजळीत पाणी पिण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आयुक्त गणेश पाटील यांच्या सहिनीशीचा आदेश किंबहूना फतवा आज पालिकेतील सर्व विभाग प्रमुख व सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यात आपण अथवा आपले अधिनिस्त कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना प्लॅस्टिकची पिशवी तसेच बाटली (बिसलेरी) सोबत आणू नये. याची दक्षता घेण्यात यावी. कार्यालयात कमीतकमी कचरा निर्माण व्हावा. हा त्यामागील उद्देश आहे. असे आदेशात उल्लेखले आहे.
जर कार्यालयात पिशव्या, बिसलेरी, कप अशा प्लॅस्टिकच्या वस्तू आढळल्यास संबंधित विभागप्रमुख कर्मचारी यांच्या विरुद्ध तसेच पदाधिकारी यांच्या कार्यलयात ह्या वस्तू दिसून आल्यास तर संबंधित पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्य अर्थात पीए तथा लिपिक यांच्यावर दंडात्मक रकम आकारून कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे.
महासभेत बिसलेरी ऐवजी ग्लास दिसणार काय?
दरम्यान सर्व विभागात पाण्याच्या बिसलेरी बॉटल्स दिसत होत्या त्याप्रमाणेच महासभेतही असतात. आम्ही गरीब कर्मचारी पालिकेच्या वॉटर कुलरच्या नळांवर ओंजळीने पाणी पिऊ शकतो. पण अधिकारी, पदाधिकारी यांची काळजी वाटते. त्यांच्यासाठी हंडे किंवा माठ पालिकेत आणावे लागतील. त्यातील पाणी ग्लासने द्यावे लागणार. पण महासभेचे कसे करणार? महासभेत बिसलेरी ऐवजी ग्लास दिसणार काय? असा प्रश्न कर्मचारी दब्या आवाजात उपस्थित करू लागले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.