प्रवेशाचा गोंधळ संपवण्यासाठी ‘एनटीए’चा उतारा 

प्रवेशाचा गोंधळ संपवण्यासाठी ‘एनटीए’चा उतारा 

सांगली - केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासंदर्भातील सर्व प्रवेश परीक्षा एकाच छताखाली घेण्यासाठी एजन्सी नेमण्याची घोषणा केली. पुढील शैक्षणिक वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) सर्व उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा घेणार असून यामुळे यूजीसी आणि विद्यापीठांवरील प्रवेशप्रक्रियेचा बोजा कमी होऊन त्यांना पूर्णवेळ शिक्षण देण्यावरच लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मेडिकल आणि अभियांत्रिकी प्रवेशावेळी दरवर्षी निर्माण होणाऱ्या सावळ्या गोंधळाला आळा बसेल, असा अाशावाद शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण झाला आहे.  

मुळातच बारावीनंतर मेडिकल, अभियांत्रिकीला प्रवेश मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना ज्या काही दिव्यातून जावे लागत आहे. त्याबाबत अनेक मतमतांतरे असली तरी केंद्राची एक आणि राज्याची एक अशा दोन-दोन प्रवेश परीक्षा देताना विद्यार्थ्याच्या तोंडाला अक्षरश: फेस येत आहे. 

चालू शैक्षणिक वर्षात तर मेडिकल प्रवेशाबाबतचा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य निर्माण करणाराच होता. सध्या UGC, AICTE अंतर्गत केंद्रिय व राज्यातील परीक्षा मंडळे प्रवेश  परीक्षेचा कार्यक्रम राबवतात. बारावी परीक्षेत चांगले गुण  प्राप्त करूनही अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न त्यांना JEE, CAT, JET, NEET आदी परीक्षा देऊनच त्यात चांगले गुण मिळवून पूर्ण करावे लागतात. मात्र, यासाठी केंदाची व राज्याची वेगवेगळी परीक्षा आहे. यातून विद्यार्थी, पालकांची आर्थिक पिळवणूकही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यावर तातडीने उपाययोजनाची गरज निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यात आणि केंद्रीय पातळीवर एकच प्रवेश प्रक्रिया राबवण्याची विद्यार्थ्यांचीही मागणी होती.

केंद्र शासनाने ‘एनटीए’ची केलेली घोषणा शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रवेश प्रक्रियेच्या जोखडातून मुक्त झाल्याने संबंधित शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे अधिक लक्ष देता येईल. वारंवार प्रवेशावेळी निर्माण होणारा गोंधळ निश्‍चितच  कमी होण्यास मदत होईल. 
- प्रा. डॉ. राजेश पाध्ये,  वालंचद कॉलेज, सांगली.

शासनाने ‘एनटीए’बाबत केलेली घोषणा निश्‍चितच स्वागतार्ह असून याचा विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा होईल. अर्थसंकल्पात याची घोषणा झाली असून लवकरच याबाबतचे धोरण जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. प्रवेश प्रक्रियेचा भार कमी झाल्यामुळे महाविद्यालयांना शैक्षणिक कामांकडे अधिक लक्ष  देण्यास अधिक वेळ मिळेल. याचाही फायदा विद्यार्थी व महाविद्यालये दोघांनाही होणार आहे.   
- प्राचार्य बाजीराव पाटील,  पीव्हीपीआयटी कॉलेज, बुधगाव.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेविरोधात याचिका
यावर्षीच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. याबाबत न्यायालयाने राज्याचे वैद्यकीय संचालनालय आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला ३ फेब्रुवारी २०१७ रोजी नोटीस बजावली आहे.  

वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणाला देशपातळीवर एकसूत्रीपणा आण्याच्या दिशेन घेतलेला हा सकारात्मक निर्णय आहे. पण यासाठी देश पातळीवर अभ्यासक्रम समान ठेवले तरच त्यास परिपूर्णत्व प्राप्त होईल. त्यासाठी सर्व राज्यांशी विचारविनिमय करून अभ्यासक्रम समपातळीवर आणावेत, अशी अपेक्षा आहे. 
- डॉ. शिवानंद कुलकर्णी, मिरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com