शेतकऱ्यांसाठी तक्रारपेटी लावण्याचे आवाहन
सोलापूर - मागील आठवड्यात सरकारने शाळांमध्ये तक्रारपेटी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरवात झाली आहे. ज्याप्रमाणे शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठीही तक्रार पेट्या लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभारावर सोशल मीडियाने विश्वास दाखविला आहे. पण, फक्त शाळेतच तक्रार पेटी का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या सर्वच ठिकाणी तशा पेट्या लावण्याचेही आवाहन केले आहे. त्याचबरोबर तलाठी सज्जा, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त ते मंत्रालय याठिकाणी तक्रार पेट्या का नकोत? फक्त शाळेतच त्या का हव्यात? असेही प्रश्न विचारले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरही तक्रार पेट्या अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून तुमच्याबद्दल लोकांच्या काय तक्रारी आहेत हे तरी आम्हाला कळू द्या. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी लोकपाल, कोर्टाचा प्रतिनिधी व मुख्यमंत्र्यांसमोर उघडण्याचेही आवाहन केले आहे.
तक्रार पेटी लावायचीच असेल तर ती शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग या प्रत्येक ठिकाणी लावा. मग बघा कसा तक्रारीचा पाऊस पडतो ते, असाही उल्लेख त्यामध्ये केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकायला तक्रार पेटी बसविण्याचेही आवाहन केले आहे.
|