गोंदवले यात्रेवर नोटाबंदीचा परिणाम

गोंदवले बुद्रुक (ता. माण) - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यात्रा भरली असून, यावर नोटाबंदीचा परिणाम झाल्याने दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली आहेत. (फिरोज तांबोळी - सकाळ छायाचित्रसेवा)
गोंदवले बुद्रुक (ता. माण) - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यात्रा भरली असून, यावर नोटाबंदीचा परिणाम झाल्याने दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली आहेत. (फिरोज तांबोळी - सकाळ छायाचित्रसेवा)

आठ दिवसांत भाविकांच्या घटत्या संख्येबरोबर व्यवसायातही ५० टक्के घट
गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या १०३ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या यात्रेवरही नोटाबंदीचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत भाविकांच्या घटत्या संख्येबरोबरच व्यवसायांवरही ४० ते ५० टक्के परिणाम झाल्याने व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.       

येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०३ वा पुण्यतिथी महोत्सव गेल्या बुधवारपासून (ता.१४) सुरू झाला आहे. या महोत्सवानिमित्त ‘श्रीं’च्या समाधी मंदिरालगत यात्रा भरली आहे. यात्रेत सातारा-पंढरपूर रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी मेवामिठाई, खेळणी, ‘श्रीं’चे फोटो, माळा यासह लहान मुलांसाठी पाळणे व इतर करमणुकीची साधने थाटली आहेत. यात्रेच्या पहिल्या कोठी पूजनादिवशी गत काही वर्षांच्या तुलनेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे जाणवत होते. परंतु, यात्रेचा कालावधी वाढत जावून भाविकांची संख्याही वाढेल, अशी आशा व्यक्त होत होती. शनिवार आणि रविवारी सुट्यांमुळे भाविकांची संख्या वाढली. परंतु, सोमवारनंतर पुन्हा ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने यात्रेवरही परिणाम झाला. देशात सुरू असलेल्या नोटाबंदीमुळे यात्रेसाठी येण्यासाठीही पुरेसे पैसे उपलब्ध होत नसल्याचे भाविकांकडून ऐकायला मिळत आहे. अनेक तास बॅंकांच्या रांगांमध्ये उभे राहून केवळ दोन ते पाच हजार रुपये मिळत असल्याने भाविकांनी खर्चावरही मर्यादा घातल्याची चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे. सुट्यांमुळे यात्रेत भाविकांची गर्दी वाढली होती. परंतु, खरेदी करण्यासाठी पुन्हा सुट्या पैशांची अडचण येत असल्याने यात्रेतील दुकानंमधून मात्र सामसूमच दिसत होती. 

गेल्या अनेक वर्षांपासून मेवामिठाईचे दुकान घेवून येणारे लालाशेठ शेख यांनी सांगितले की, ‘‘दरवर्षी यात्रेत रोज किमान ५० किलो जिलेबी विक्री होत असे. यंदा मात्र रोज ३०किलोचाही कसाबसा खप होत आहे. शिवाय संपूर्ण यात्रेत एक हजार किलो पेढे खपतात. तोच खप यंदा आतापर्यंत ५०० किलोपर्यंतही झालेला नाही. चिरमुऱ्याचा प्रसाद म्हणून अनेक भाविक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावेळी मात्र यावरही परिणाम झाल्याचे विजय पवार या व्यावसायिकांनी सांगितले. लहान मुलांसाठी पाळणे व इतर करमणुकीच्या खेळांसाठी सुट्या पैशाची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र, ग्राहकांकडे सुट्या पैशांची चणचण असल्याने हे व्यावसायिकही यंदा अडचणीत सापडले आहेत. 

आज व उद्या यात्रेचे मुख्य दिवस
उद्या (गुरुवारी) व शुक्रवारी (ता.२३) यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, यात्रेतील सरासरी व्यवसायावर घट झाल्यामुळे व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com