असेल तो दर द्या; पण तुम्हीच सोयाबीन घ्या!

असेल तो  दर द्या; पण तुम्हीच सोयाबीन घ्या!

ढेबेवाडी - भाडेखर्च करून सुमारे ३५ किलोमीटरवरील हमीभाव केंद्रात सोयाबीन विक्रीसाठी न्यावा लागत असल्यामुळे आणि तेथील अटींमुळे तो स्वीकारला जाईल याचीही शाश्‍वती नसल्याने या परिसरातील शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांनाच सोयाबीन खरेदीसाठी गळ घालत आहेत. ‘काय असेल तो दर द्या; पण तुम्हीच सोयाबीन घ्या’ असा आग्रह त्यांच्याकडून होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना हुसकावणाऱ्या बाजार समितीच्या संचालकांच्या घरात जाऊन शेतकरी बाजारहटासाठी पैसे मागत असल्याने व्यापाऱ्यांवर दडपण आणणाऱ्या संचालकांचीही मोठी गोची झाली आहे.     

परिसरात सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून, प्रतिवर्षी त्यात वाढ होत चालली आहे. सोयाबीन विक्रीवरच येथील अनेक शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित आधारलेले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सोयाबीनची विक्री करतात. मात्र, यंदा हमीभावाची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सुरवातीपासूनच सोयाबीनची खरेदी थांबवली.

ऑइल मिलचालकांना व्यापारी सोयाबीन विकतात. मात्र, पुढूनच हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्याने आधारभूत किमतीमध्ये त्याची खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता व्यक्त करूनही काही दिवस दुकानेही बंद ठेवली होती. ढेबेवाडीसह परिसरातील आठवडा बाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. कऱ्हाडसह परिसरातून धान्य व्यापारी बाजारासाठी येतात. खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी आणि भुईमूगाच्या काढणीनंतर धान्य बाजारात मोठी उलाढाल होते. महिन्यापूर्वी पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी येथे धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शासनाने निश्‍चित केलेल्या आधारभूत किमतीची माहिती दिली. संकरित ज्वारीला १७०० रुपये, मालदांडी ज्वारीला १७२५ रुपये, बाजरी आणि मक्‍याला सर्वसाधारण १४२५ रुपये, तुरीला पाच हजार ४५० रुपये, उडीद पाच हजार ४००, मुगाला पाच हजार ५७५ रुपये, भुईमुगाच्या शेंगाना चार हजार ४५० रुपये, सुर्यफूलला चार हजार १०० आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार ५० रुपये दर देणे बंधनकारक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, सोयाबीनला पुढूनच ३०५० दर मिळत नसल्याने एवढे मोठे नुकसान आम्ही कसे सोसणार असे सांगत व्यापाऱ्यांनी हमीभावाप्रमाणे खरेदीस असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर पाटणला हमीभाव केंद्र सुरू करून तेथे सोयाबीन नेऊन विकण्याचे आवाहन बाजार समितीने शेतकऱ्यांना केले. मात्र, ३५ किलोमीटरवर सोयाबीन घेऊन जाण्यासाठी होणारा भाडेखर्च आणी केंद्रावरील खरेदीच्या जाचक अटी यामुळे शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांनाच सोयाबीन खरेदीसाठी गळ घालायला सुरवात केली आहे.

सोयाबीन व धान्य विकून बाजारहाट व अन्य खरेदी करण्याच्या उद्देशाने शेतकरी धान्य घेऊन बाजारास येतात. मध्यंतरी व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने धान्याने भरलेली पोती परत घराकडे घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे ‘काय असेल तो दर द्या; पण तुम्हीच सोयाबीन घ्या’ असा आग्रह त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना होत आहे.

शेतकरी संचालकांच्या घरात...
सध्या परिसरातील बाजारातून २६०० ते २६५० रुपये क्विंटल दराने सोयाबीन व्यापाऱ्यांना विकले जात आहे. कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना विरोध करून हुसकावणाऱ्या बाजार समितीच्या संचालकांनाच शेतकरी बाजारहटासाठी पैसे मागत असल्याने व्यापाऱ्यांवर दडपण आणणाऱ्या संचालकांचीही मोठी गोची झाली आहे. व्यापाऱ्यांची दुकाने बंद पाडून बाजारहाटासाठी सोयाबीन विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना परत कसे पाठवायचे? असाही प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com