शवविच्छेदनगृहाच्या ‘पोस्टमार्टम’ची गरज

Postmartam
Postmartam

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाची स्वच्छता व एसीसह फ्रिजरच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

शहरासह जिल्ह्यात व्हायरल फिव्हर व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा रुग्णालयारोबरच परिसराच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे आवश्‍यक आहे. मात्र, सध्याची स्थिती वेगळीच आहे. स्वच्छतेबरोबरच शवविच्छेदनगृहाकडे असलेले दुर्लक्ष परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारणीभूत ठरत आहे. या शवविच्छेदनगृहामध्ये सुरवातीला एसीसह फ्रीजरची सुविधा असलेले शवागार नव्हते. त्यामुळे बेवारस मृतदेह तसेच शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह उघड्यावरच ठेवले जात होते. वारस असलेले मृतदेह वेळेत नेले जायचे; मात्र बेवारस मृतदेह किमान तीन दिवस ठेवावे लागत होते. त्यातही पालिकेचा कर्मचारी उपलब्ध न झाल्यास सहा-सात दिवस मृतदेह तसाच ठेवला जायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या कार्यकाळात या शवागृहात एसीसह फ्रीजरची सुविधा निर्माण करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील दुर्गंधी कमी झाली होती. 

काही काळ ही यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत होती. आता पुन्हा शवागृहाची स्वच्छता व एसीच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शवविच्छेदनगृहातून पुन्हा दुर्गंधी येऊ लागली आहे. परिसरात वाढलेल्या गवतामुळेही अस्वच्छता आहे.

कॉलनीतील रहिवाशी त्रस्त 
या शवागृहाला लागूच ‘अजिंक्‍य’, ‘सह्याद्री’ व ‘रामकृष्ण’ अशा कॉलनीज्‌ आहेत. या दुर्गंधीचा तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. सध्या आजाराच्या काळात या दुर्गंधीमुळे वातावरण दूषित होत आहे. अनेक वृद्ध नागरिक या कॉलनीमध्ये राहतात. त्यामुळे या दुर्गंधी व अस्वच्छतेवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

जिल्हा रुग्णालय परिसरातही दुर्गंधी
जिल्हा शासकीय रुग्णालयातच दुर्गंधी वाढली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून येथे रुग्ण येत आहेत. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ परिसर महत्त्वाचा असतो. मात्र, जिल्हा रुग्णालयात या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. विविध वॉर्डमध्ये अस्वच्छता जाणवत आहे. स्वच्छतागृहातील पाणी जाण्याचे आउटलेट तुंबल्यामुळे काही वॉर्डमधील पाणी तुंबत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या आरोग्याला अपाय होण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com