थकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे 

थकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे 

फलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य प्रकारे तयार करणे आवश्‍यक असून, टॅंकर भरून देण्याऐवजी कालव्यातील पाण्याने परिसरातील तलाव, विहिरी भरून घेणे अशी उपाययोजना करावी, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज येथे दिल्या. टंचाई काळात थकित वीजबिलासाठी कोणाचेही वीज कनेक्‍शन तोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर आदी उपस्थित होते. 

श्री. शिवतारे म्हणाले, ""प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीजबिलाबाबत त्यावरील व्याज, दंड माफ करता येईल, तसेच 14 व्या वित्त आयोगातून निधीच्या उपलब्धतेबाबत प्रयत्न करणे शक्‍य होणार आहे.'' चारा लागवडीसाठी किती क्षेत्र उपलब्ध आहे, याचे नियोजन करून दोन महिन्यानंतरच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

टंचाईची तीव्रता जानेवारीनंतर मोठ्या प्रमाणात जाणवणार असून, चारा डेपो व जनावरांच्या छावण्या सुरू करण्याच्या दृष्टीने योजना आखाव्यात, असे माणिकराव सोनवलकर यांनी सूचित केले. 

जिल्हा पातळीवर होणाऱ्या डीपीडीसीच्या बैठकीत टंचाई निवारण्यासाठी काय नियोजन करता येणे शक्‍य होईल, याबाबत विचार केला जाईल, असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com