सोलापूर - केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील तूर मुदतीत खरेदी न झाल्याने तूर खरेदीला मंगळवारपर्यंत (ता.15) मुदतवाढ दिली. मात्र, अद्यापही 1 लाख 81 हजार 447 शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करावयाची शिल्लक आहे. त्यामुळे आता पुन्हा महिन्याची मुदतवाढ मिळावी, म्हणून महाराष्ट्र राज्य फेडरेशनने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे.
राज्यात यंदा 12 लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. त्यानुसार साडेअकरा लाख टन उत्पादन अपेक्षित असून, त्यापैकी 4.45 लाख टन तूर खरेदीचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या वर्षातील शेतकऱ्यांकडील तूर हमीभावाने खरेदी करण्याकरिता प्रारंभी सरकारने 25 एप्रिलपर्यंत मुदत ठेवली. त्यानंतरही तूर शिल्लक असल्याने 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, या कमी कालावधीत शेतकऱ्यांकडून तूर खरेदी होऊ शकली नाही आणि त्यातच गोदामांअभावी तूर खरेदी मंदावली होती. मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या 189 केंद्रांमार्फत प्रतिक्विंटल 5,450 रुपये हमीभावाने तूर खरेदी करण्यात येत आहे. सरकारने आता पावसाळ्यापूर्वी शिल्लक तूर खरेदीसाठी महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी संघटनांकडून होत आहे. दुसरीकडे मागील वर्षाची व यंदाची तूर गोदामांमध्ये तशीच पडून आहे. तुरीलाही आणि डाळीलादेखील मागणी नसल्याने सकारची चिंता वाढली असून, त्याबाबत मंगळवारी, मंत्रालयात बैठक पार पडल्याचे समजते.
4,58,306 नोंदणीकृत शेतकरी
25,87,916 क्विंटल आतापर्यंत खरेदी
1,81,447 शिल्लक शेतकरी
19,73,859 क्विंटल शिल्लक तूर
|