कोल्हापूर - राज्यातील शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटली असली तरी तुर्तास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यापैकी कोणालाही पाठिंबा नसेल. हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा असल्याची गुगली टाकत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर निवडणुका हाच पर्याय असू शकतो, असे सांगत पुन्हा एकदा मुदतपूर्व निवडणुका होतील, असे सूचित शनिवारी केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असताना पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शिवसेना-भाजपाची युती तुटली ही चांगली गोष्ट झाली, त्यात आम्ही काय करणार? त्याचा फायदा दोन्ही कॉंग्रेसलाच होईल. पण सरकारमधील शिवसेना असो किंवा भाजप या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कधीही पाठिंबा नसेल. यापूर्वी पाठिंबा दिला नव्हता, आताही देणार नाही. 'शिवसेनेने यापुढे कोणत्याच निवडणुकीत भाजपशी युती करणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये राहील असे वाटत नाही. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली नाही तर सत्तेसाठी हे लोक काहीही करतात असा संदेश लोकापर्यंत जाईल,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
युती तुटण्याचे भाकित पवार यांनी यापूर्वीच केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, माझे तसे निरीक्षण होते, हे पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर एकत्र राहणार नाहीत हे पूर्वीच सूचित होत होते. वृत्तपत्र व दूरचित्रवाणीमधून मात्र युती टिकेल असे चित्र वारंवार रंगविले जात होते, पण माझे निरीक्षण वेगळे होते.'
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थितीही वेगळी असते. देश किंवा राज्याचे धोरण, राजकारण ठरवणाऱ्या या निवडणुका नसतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणाशी आघाडी कोणी केली याला काही अर्थ राहत नाही.'' या वेळी महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी उपस्थित होते.
निरूपम हा मूर्ख माणूस
राष्ट्रवादी-भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा समाचार शरद पवार यांनी घेतला. "निरूपम हा मूर्ख माणूस आहे. राज्याच्या प्रगतीत या माणसाचे योगदान काय? ज्या पदावर ते आहेत तेथून पायउतार झाल्यानंतर त्यांची किंमत काय रहाणार? त्यांना कोण विचारणार?,' या शब्दांत पवार यांनी त्यांचा समाचार घेतला.
राष्ट्रपती पदाबाबत भान आहे
आपण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, 'माझ्या पक्षाचे संख्याबळ पाहता मला परिस्थितीचे भान आहे. पुरेसे संख्याबळ नसताना या पदाचा विचारही डोक्यात नाही. मी त्याबाबत आशावादी नाही.''
|