कऱ्हाड दक्षिणवरील कब्जासाठी थोपटले दंड

कऱ्हाड दक्षिणवरील कब्जासाठी थोपटले दंड

कऱ्हाड - माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सत्काराचे नेटके नियोजन रयत संघटनेने केले. रयत संघटनेच्या माध्यमातून उंडाळकरांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा जीवनपट उलगडतानाच कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय पटावरील कब्जा कायम राहण्यासाठी संघटनेची ताकद दाखवण्यासाठीही हा कार्यक्रम पूरक ठरला. त्याचबरोबर रयत संघटनेचे कार्यकर्ते चार्ज करण्यात उंडाळकर गटाला यश आले असून, विधानसभेची साखरपेरणीही त्यामाध्यमातून झाली आहे. अद्याप घोडेमैदान लांब असले, तरी त्याचे रणशिंग मात्र कालच्या कार्यक्रमातून फुंकले गेले आहे.  

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उंडाळकरांनी स्थापन केलेल्या रयत संघटनेच्या पन्नासाव्या वर्षाचीही जोड त्याला देण्यात आली होती. 

दक्षिणेत काकाच वस्ताद...
या मतदार संघात त्यांना तोड नाही. ते वस्ताद आहेत. पुढील निवडणुकीत ते नक्कीच आमदार होतील असे सूतोवाच करताच, कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून जयवंतराव आवळे यांच्या वक्तव्याला चांगलीच दाद दिली. त्याचबरोबर अनेकांनी साखर कारखाने काढले; पण काकांनी कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना काढला असून, त्यांनी आता काँग्रेसमध्ये यावे, अशी व्यक्‍त केलेली अपेक्षाही कार्यकर्त्यांसाठी फार बोलकी ठरली आहे. 

रयत संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या युवकांना एकत्र करून ॲड. उदयसिंह पाटील यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. कार्यक्रमास किती लोक येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, उंडाळकरांनी आजपर्यंत अनेकांना केलेली मदत, गावागावांत केलेली विकासकामे याची जाण ठेवून कार्यकर्ते व महिला भर दुपारच्या रणरणत्या उन्हातही मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. उपस्थित लोकांची गर्दी पाहून माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी माझे मित्र उंडाळकर सात वेळा आमदार असतानाही काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय केला. तो अन्याय दूर झाला पाहिजे, असे राजकीय सूतोवाच करून सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना हार घालून काँग्रेसमध्ये घ्यावे, असा शाब्दिक टोलाही त्यांनी मारला. त्यांच्या या वक्तव्यातून उपस्थित गर्दीला योग्य संदेश मिळाला. त्यामुळे त्यांनी टाळ्यांची दाद देऊन उंडाळकरांच्या नेतृत्वावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. त्यालाच दाद देत उंडाळकरांनीही मी अजून थकलेलो नाही. कार्यकर्त्यांनो थोडे थांबा, परिस्थिती बदलणार आहे, अशा शब्दात विरोधकांवर शरसंधान साधून कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला. भर उन्हातही गर्दी जमणे हीच विलासकाकांची खासियत आहे. एक छदामही न घेता, सातवेळा या जनतेने मला निवडून दिले. हा मोठा विक्रम आहे, असेही त्यांनी स्पष्ट करून कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील श्रद्धा आजही कायम असल्याचेच दाखवून दिले. एकूणच या सत्कार कार्यक्रमातून कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय पटावरील कब्जा कायम राहण्यासाठी उंडाळकर गटाने रयत संघटनेची काल ताकद दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com