उठसूट आंदोलनामुळे धार झाली बोथट

उठसूट आंदोलनामुळे धार झाली बोथट

कोल्हापूर - शासकीय-निमशासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार आहे, तोंड पाहून काम करायची पद्धत आहे, सरळ उत्तर न देण्याचा प्रघात आहे... हे सारं त्या-त्या व्यक्तीनुरूप खरंच आहे. पण, म्हणून पंधरा-वीस जणांनी एकत्र यायचं, कार्यालयात घुसायचं, शिवीगाळ करायची, दहशत निर्माण करायची व आज एका कार्यालयात हा प्रकार केला की दुसऱ्या कार्यालयात तशीच संधी शोधायची. या वाढत्या प्रकाराला न्यायालयाच्या निर्णयाने थोडा तरी चाप बसू शकणार आहे. उठसूट कधी-कधी संघटनेच्या नावाने, तर कधी व्यक्तिगत ताकद तयार करण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या आंदोलनाला सरकारी, निमसरकारी अधिकारी- कर्मचारी वैतागले आहेत. महापालिका पाणीपुरवठा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने तर ‘आंदोलनाला कंटाळून’ असे लेखी कारण सांगून बदली करून घेतली आहे.

भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे, हे खरे आहे. पण, उठसूट आंदोलनामुळे या आंदोलनाची ताकदही कमी झाली आहे. आंदोलन करायचे, छायाचित्रे काढायची, हा प्रघात झाला आहे. पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रकार म्हणजे तर हसत-हसत लुटुपुटीची लढाई झाली आहे.

पोलिसांनी अशा उठसूट आंदोलन करणाऱ्यांची एक वेगळीच यादी केली आहे. एखाद्या गंभीर प्रश्‍नावर आंदोलन जाहीर झाले की त्यातले लोक कोण, यावर आंदोलनाची पोच किती, हे आता ठरू लागले आहे. 

वास्तविक, आंदोलन हे भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना भानावर आणण्यासाठी एक मोठे हत्यार आहे. अशा धारदार आंदोलनांनी कोल्हापूर जिल्हा गाजला आहे. या आंदोलनातील प्रमुख नेत्यांची नावे आजही पाहिली तरी भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरते, अशी आंदोलनाची परंपरा आहे. याला कारणही असेच होते. 

आंदोलन करणाऱ्या नेत्यांचे एक नैतिक सामर्थ्य होते. आजही अशा नेत्यांची परंपरा चालविणारे, भक्कम पुराव्यावर समोरच्याला निरुत्तर करणारे काही कार्यकर्ते जरूर आहेत. पण, याचवेळी उठसूट आंदोलनांचे प्रमाणही वाढले आहे. आंदोलन जाहीर करायचे, आंदोलन करायचे व पाहता-पाहता एक दिवस नकळत प्रकरण मिटवायचे, अशी काहींची पद्धत झाली आहे. त्यामुळे आंदोलनामागची भावनाच बदलली आहे.

टोलविरोधातील आंदोलन
‘आयआरबी’च्या विरोधातल्या आंदोलनाला एक स्पष्ट दिशा असल्याने व खंबीर नेते त्यात असल्याने या आंदोलनाने देशात इतिहास घडला. मी मी म्हणणाऱ्यांना या आंदोलनाचा झटका बसला. अशीच खंबीर ताकद लावून महापालिका, पोलिस, आरटीओ, जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कचेरी, रजिस्टर ऑफिस, सीटी सर्व्हे, एमएसईबी येथे आंदोलन झाले तरच त्याचा परिणाम होईल. अन्यथा उठसूट आंदोलनाने आंदोलनाची धारच कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com