व्याज सवलतीला शेतकरी मुकणार 

व्याज सवलतीला शेतकरी मुकणार 

कोल्हापूर - कर्जमाफीचा लांबलेला निर्णय आणि कर्ज भरण्याची उद्याची (ता. 30) शेवटची मुदत यामुळे बहुंताशी शेतकरी केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेला मुकण्याची शक्‍यता आहे. कर्जमाफ होईल म्हणून प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले, अशा शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत कर्ज नाही भरले तर ते थकबाकीत जाऊन त्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. 

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाबार्डकडून जिल्हा बॅंकेला व तेथून विकास सोसायट्यामार्फत कर्जपुरवठा केला जातो. 1 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने तर 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज हे 2 टक्के व्याजाने शेतकऱ्यांना दिले जाते. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शून्य टक्के दराने दिलेल्या एक लाखापर्यंतचे कर्ज हे जिल्हा बॅंकेला सहा टक्‍के व्याजाने नाबार्ड देते. या सहा टक्‍क्‍यापैकी तीन टक्के राज्य व तीन टक्के व्याज केंद्र शासन देते. एक ते 3 लाखापर्यंतच्या व्याजापोटी राज्य शासन तीन टक्के तर केंद्र सरकार दोन टक्के रक्कम देते. 

पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. पण गेल्या दोन-तीन महिन्यापासून राज्यभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सुरू आहे. यावरून आंदोलन, शेतकरी संप, संघर्ष, आत्मक्‍लेश यात्रेच्या माध्यमातून राज्य ढवळून निघाले. विरोधकांबरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेना व स्वाभिमानीबरोबरच शेतकऱ्यांच्या दबावामुळे सरकारने 17 जूनला क्षेत्राची अट रद्द करून कर्जमाफीचा निर्णय घेतला. 30 जून 2016 पर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांचे कर्ज या योजनेत माफ होईल तर प्रामाणिकपणे कर्ज फेडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजार रूपये देण्यात येणार आहेत. 

कर्जमाफीचा निर्णय आज होईल, उद्या होईल या प्रतीक्षेत शेतकरी होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही कर्ज भरण्यास टाळाटाळ केली. जिल्हा बॅंकेची यावर्षीची वसुली 72 टक्के झाली असली तरी अजूनही 28 टक्के कर्ज वसूल झालेले नाही. उद्या (ता. 30) कर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिड लाख रूपयांची माफी मिळणार असली तरी त्यावरील कर्जाची रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्याशिवाय त्याला योजनेतील दीड लाख रूपये मिळणार नाहीत. अशा शेतकऱ्यांची संख्या जास्त असून उद्या एका दिवसात त्यांच्याकडून कर्ज भरणे शक्‍य नाही. त्यामुळे असे शेतकरीही व्याज सवलत योजनेला मुकणार आहेत. 

प्रामाणिक शेतकरीही अडचणीत 
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या भरलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रूपये देण्यात येणार आहेत. पण या शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत आपल्या खात्यावरील कर्ज भरले नाही तर ते थकबाकीदार ठरतील व त्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याची शक्‍यता आहे. 

योजनेला मुदतवाढीची मागणी 
शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ 1 जुलैनंतर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना होणार नाही. म्हणून या योजनेला सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ मिळावी,अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

दृष्टीक्षेपात थकित कर्ज 
कर्जाचा प्रकार शेतकरी संख्या थकीत रक्कम दिड लाखापर्यंतचे शेतकरी दिड लाखानुसार रक्कम 
पीक कर्ज 41 हजार 676 194.69 कोटी 39 हजार 72 128.94 कोटी 
मध्यम मुदत 11 हजार 586 65.85 कोटी 10 हजार 865 44.36 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com